पुणे : उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) निर्मितीविषयी असलेले आक्षेप ‘एचसीएमटीआर’ नागरिक कृती समितीने पुणे महानगरपालिका रस्ते विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेऊन नोंदवले. या आक्षेपांचे पत्र नगर नियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, जिल्हाधिकारी सौरभ राव आणि अनिरुद्ध पावसकर यांना पाठविण्यात आले आहे. या प्रकल्पाची जनसुनावणी घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे.
हा वर्तुळाकार मार्ग १९८३च्या आराखड्यात फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी असताना तो त्या काळात शहराच्या वेशीवर बांधण्याचा विचार होता. १९८३पासून शहर रचना खूप बदलली असून, २०१९ सालात हा प्रोजेक्टचा मार्ग आता शहराच्या मध्यवर्ती, दाट वस्तीतून जाणार असून, तो आजच्या परिस्थितीला किती उपयोगाचा ठरेल हा प्रश्न उद्दभवला आहे. या प्रोजेक्टमध्ये बदल करून, चार मार्गिका या खासगी वाहनांसाठी ठेवण्याचे आणि फक्त दोन मार्गिका ‘बीआरटी’साठी करण्याचे टेंडर निघाले आहे. मुळात साडेआठ हजार कोटी खर्चाच्या या मोठ्या प्रकल्पाला जनसुनावणी न घेता असा अचानक बदल योग्य नाही, असे कृती समितीने म्हटले आहे.
खासगी वाहनांना प्राधान्य देणे हे नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी, स्टेट अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी आणि पुण्याचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या विरोधात आहे. ‘एचसीएमटीआर’ खासगी वाहनांना प्राधान्य देण्याबरोबर सार्वजनिक वाहतुकीला माग पाडत आहे. हा प्रोजेक्ट वाहतुकीची कोंडी समस्येला न सोडवता ही समस्या फक्त एका हायवेवर नेऊन सोडणार आहे, असे नागरिक कृती समितीचे म्हणणे आहे.
‘एचसीएमटीआर’मुळे भूजल पुनर्भरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार आहे. वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, चतुःशृंगी अशा टेकड्यांमुळे, पाणलोट क्षेत्रामुळे पुण्यातील पर्जन्यजल पुनर्भरण व्हायला मदत होते. अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल रचना धोक्यात आणणे चुकीचे ठरणार आहे. कोणत्याही विकासकामांमुळे टेकड्यांचा, वनांचा आणि मोकळ्या जागांचा नाश होता कामा नये. विधी महाविद्यालय टेकडी, एसआरपीएफ टेकडी, व्हॅम्नीकाँन टेकडी उतारांचा, दोन हजार झाडांचा या प्रकल्पामुळे नाश होणार आहे.
८० टक्के जागा शासनाच्या ताब्यात आल्याशिवाय टेंडर काढले जाणार नाही, असा पालिकेचाच २०१८चा नियम असताना या प्रकल्पाची ५० टक्केही जमीन ताब्यात नसताना टेंडर काढले आहे. संरक्षण खाते आणि रेल्वेनेही जागा देण्यास अजून तयारी दाखवलेली नसताना हा प्रकल्प पुढे नेण्याची घाई केली जात आहे.
मेट्रो आणि ‘एचसीएमटीआर’चा एकत्रित वाहतूकसंदर्भाने अभ्यास व्हावा, पर्यावरण खात्याच्या मान्यताप्राप्त, तज्ज्ञांकडून पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास केला जावा, सामाजिक दुष्परिणामांचा अभ्यास व्हावा, पुणे विद्यापीठ आणि पौड फाटा जंक्शन येथे मेट्रो, फ्लाय ओव्हर, एलेव्हेटेड ‘एचसीएमटीआर’ सगळेच उभारले जाणार असल्याचे नियोजन योग्य आहे का, या सर्व प्रकल्पाच्या नियोजनाचे नकाशे समितीला मिळावेत, दोन आठवड्यात आयुक्त, महापौर स्थायी समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घ्यावी, अशा मागण्या नागरिक कृती समितीने केल्या आहेत.
या बैठकीला डॉ सुषमा दाते, सत्या नटराजन, कनिझ सुखरानी, पी. के. आनंद, राजीव सावंत, हेमा चारी, सुवर्णा आँखेगावकर, मयुरेश मांडके, रमेश नारायणी, भूपेश शर्मा, पुष्कर कुलकर्णी हे विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.